welcome to The Vidarbha Gazette


नुकत्याच पाच राज्याच्या निवडणूकांचा निकाल लागला.  या निकालाचे  विश्लेषण अजूनही संपले नाही. या निवडणूकीतून कॉंग्रेसचा पार ‘निकाल’ लागला.  पंजाब मधील कॉंग्रेसची सत्ता उलथवून आम आदमी पार्टी ऐतिहासिक विजय मिळविली. आपचे हे यश  कॉंग्रेस समर्थकांना जिव्हारी लागला. लागलीच, ‘आप’ ला भाजपची ‘ बी टिम’ म्हणत, टिका सुरू केली. मात्र ‘ आप’ ने हे यश कसे मिळविले?
 ‘आप’ने दिल्लीतील जनतेने, त्यांना दिलेल्या संधीचे कसे सोने केले यावर मात्र हे टिकाकार बोलत नाही. केंद्रातील मोदी सरकार कितीही मजबूत असले, इडी, सिबीआय, इसी सारख्या यंत्रणा हातात असले तरीही मोदींना थांबविता येवू शकते हे आम आदमी पार्टीने दिल्लीत सिध्द करून दाखविले आहे. हे एकदा नव्हे अनेकदा दाखवून दिले आहे.  मोदिना पर्याय हवा असे वाटणार्याना भाजपात्तर विरोधकांना मोदी पदच्यूत करण्यांचा आपचा मॉडेल दिसत नसावा काय?
सामान्य जनतेच्या दृष्टीने, किमान महाराष्ट्रात तरी, मतदानाचे वेळी मतदार एकच बोलतो, ‘कोणीही आले तरी, तसेच’ याचा अर्थ सत्तेतील माणसे बदलात, प्रत्यक्ष प्रशासनात काही फरक पडत नाही. आधीचाच भ्रष्टाचार पुढे चालतो, आधीच्याय योजना, फारतर नाव बदलून पुढे चालतात.  त्यामुळे कॉंग्रेस ऐवजी भाजपा आली काय किंवा भाजपा ऐवजी कॉंग्रेस आली काय? सत्तेतील बदलांचा फायदा लोकांच्या जीवनांवर होत नसतो. फक्त ठेकेदारीत वरचढ कोण? एवढाच या सत्तातंराचा अर्थ असतो. त्यामुळेच, जे पक्ष, इतरांपेक्षा काही वेगळे देवू शकते, अशांनाच लोक संधी देतात, अशी संधी आम आदमी पार्टीला दिल्लीतील जनतेने दिली आणि त्याचे त्यांनी सोने केले.
कॉग्रेसने देशाला स्वातंत्र मिळवून दिले आहे, हा पक्ष धर्मनिरपेक्ष आहे, यामुळे देशात कॉंग्रेसची सत्ता राहीली पाहीजे असा विचार करणारा एक वर्ग आहे.  कॉंग्रेसने देशाला स्वातंत्र मिळवून दिले आहे, हे सत्य कुणी नाकारणार नाही, मात्र एवढ्याच कारणावरून किती पिढ्यानी कॉंग्रेसलाच डोक्यावर घ्याव? पिढ्या बदललेल्या आहेत, पक्षही बदलले आहे, जग बदलले आहे विचारही बदललेे,  प्रश्न ही बदलले असतानाच, पुर्वजाच्याच कमाईवर किती दिवस सत्ता भोगणार? देशाला धर्मनिरपेक्ष सत्तेची गरज आहे, सध्याच्या वातावरणातही आवश्यक आहे, मात्र या एकाच विचारांने सामान्य माणसाचे प्रश्न सुटणार आहे काय? धर्मनिरपेक्षता हा विचार आहे, या विचारासोबतच, चांगले आरोग्य, नौकरीच्या संधी, चांगले आणि दर्जेदार शिक्षण, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन या बाबी त्याहीपेक्षा आधी गरजेचे आहे.  भगवान बुध्दानी सांगीतल्या प्रमाणे भुकेल्याला आधी अन्न द्यावे लागते नंतर तत्वज्ञान! त्यामुळे आजच्या काळातील युवकांला, जनतेला विचारासोबतही सरकारकडून काय हवे? या दृष्टीने कोणते मॉडेल कॉंग्रेसच्या सरकारकडे आहे?
दिल्लीत आपच्या सरकारनी सामान्य जनतेला मुलभूत सुविधा मोफत दिल्या.  200 युनिट वीज, 20 हजार लिटर पाणी, महिलांना मोफत बस प्रवास, सरकारी शाळेतून दर्जेदार मोफत शिक्षण, निराधार, वृध्दांना देशात सर्वाधिक 3000 रूपये मानधन अशा अनेक योजना आहेत.  या शिवाय घरपोच सर्व सरकारी दस्ताऐवजाची डिलेव्हरी, घरपोच रेशन, शिक्षणातील विविध प्रयोग उदा. शिक्षकांना आंतरराष्ट्रिय विद्यापिठातून प्रशिक्षण, स्किल युनिव्हरसिटी स्पोर्ट युनिव्हरसिटी, आर्म फोर्सेस प्रिपरेटरी स्कूल इत्यादी इत्यादी.. हे सर्व करीत असतांना सरकारही नफयात ठेवले, देशात सर्वाधिक जीडीपी दिल्ली सरकारचे आहे, या सरकारच्या नेत्यावरही इडी, सीबीआयच्या धाडी पडल्या, मुख्यमंत्री अरविंद केजरीवालचे घराची, कार्यालयाची पोलिसांनी झडतीही घेतली, तरीही महाराष्ट्रात सुरू असलेल्या ‘सुडाचे राजकारण, सुडाचे राजकारण..’ म्हणत आपली जबाबदारी झटकली नाही. आपल्या आश्वासनाची पूर्तता केली, त्याचमुळे दिल्लीने तिसर्यांदा आणि दिल्लीशी भौगोलीक नाते असलेल्या पंजाबने आम आदमी पार्टीला संधी दिली.
कॉंग्रेसला जर भाजपाला खरेच रोखायचे आहे तर, कॉंग्रेसलाही आता नव्याने स्वत:चे मॉडेल तयार करावे लागणार आहे.  आणि करता येवू शकते आणि ते यशस्वी होवूही शकते हे ‘आप’ने दाखवून दिले आहे.  आपचे मॉडेल हे मागील सहा वर्षातीलच आहे.  आप पूर्वी दिल्लीच्या सरकारी शाळा इतर राज्यातील सरकारी शाळाप्रमाणेच होत्या, सरकारी दवाखानेही इतर सरकारी दवाखान्याप्रमाणेच होत्या.  मात्र इच्छाशक्ती आणि साफ नियत ठेवून, त्यांनी आपला प्रशासनाचा मॉडेल तयार केला, ज्यावर आज देशात सर्वत्र चर्चा केली जात आहे.  भाजपानेही गुजरात मध्ये ‘हिंदुत्वाची प्रयोगशाळा’ करून, समाजात ध्रुवीकरणाचा ‘मॉडेल’ तयार केला, तो देशभर चालवित आहे.  या मॉडेलला  आपने, शिक्षण, आरोग्यासारख्या मुलभूत सुविधा दर्जेदार करून उत्तर दिले, त्यात ते यशस्वी झाले. कॉंग्रेसकडे आज, राजस्थान, छत्तीसगड हे दोन राज्य हातात आहे, त्यात ते आपला स्वत:चा वेगळा मॉडेल तयार करून, देशापुढे मांडण्यांची संधी आहे. पुर्वजाच्या कर्तुत्वावर सत्तेत येण्यांचे दिवस परत येतील याची शाश्वती नाही, राहुल गांधी सोबत कॉंग्रेसने प्रियंका गांधीनाही रणागंणात उतरविले, मात्र जनतेने प्रियंका गांधी यांनाही नाकारले आहे. आपण जे बोलतो, ते कृतीत उतरविणार नसेल तर जनता, त्यालाही स्विकारत नाही. कॉंग्रेसच्या आश्वासनावर जनतेचा फार विश्वास नाही, उत्तर प्रदेशात प्रियंका गांधीनी ‘लडकी हू लढ सकती हॅूं। असा नारा दिला. 40 टक्के महिलांना विधानसभेच्या जागा देण्यांचे जाहीर केले. प्रत्यक्षात काय झाले? युपीत सत्तेत आल्यावर 300 युनिट विज मोफतचे आश्वासन काँग्रेसने दिले, जीथे सत्तेवर आहे, तीथे का दिल्या जात नाही? त्यामुळेच केवळ आश्वासन देण्यांऐवजी, जीथे शक्य आहे, तीथे कृतीची गरज आहे, हे होत नसल्यांने कॉंग्रेसच्या आश्वासनाकडे लोक ‘जुमला’ म्हणूनच पाहतील. जुन्याच आणि कालबाह्य झालेल्या योजनांवर आता मते मिळणार नाही, आपले विचार पेरण्यासाठी आणि सत्तेत यावे लागते आणि सत्तेच्या ताकदीवरच विचार पेरता येवू शकते, हे भाजपाने दाखवून दिले आहे. कॉंग्रेसचे धर्मनिरपेक्षतेचे विचार पेरण्यासाठी त्याना सत्तेत यावे लागेल, सत्तेत येण्यासाठी आपला स्वत:चा ‘मॉडेल’ तयार करावा लागेल.
आम आदमी पार्टीने दिल्लीत पहिल्यांदा विजय मिळविल्यानंतर, राहुल गांधी यांनी प्रामाणिक प्रतिक्रिया दिली होती, ‘आम आदमी पार्टीसे हमे कुछ सिखना पडेगा’ आम आदमी पार्टीकडून काही शिकायचे असेल तर, कॉंग्रेसचा स्वत:चा प्रामाणिक मॉडेल असेल तर, भाजपासारख्या सध्या बलाढ्य झालेल्या पक्षालाही थांबविता येवू शकते.
– विजय सिद्धावार
उपाध्यक्ष, आम आदमी पार्टी
चंद्रपूर
९७६७९९५७४८

Search

About

The Vidarbha Gazette: An Introduction

Digital media has democratized the production and consumption of media to an extent that would have been unimaginable in the past. Media production is no longer at the mercy of a few family-owned businesses and corporate houses. Roughly speaking, every person who has an android phone in hand and a few bucks to recharge their data pack have the potential to produce news and not just consume it.