welcome to The Vidarbha Gazette


बहुआयामी नेताजी राजगडकर

(स्मृती दिवस निमित्ताने लेख)

 

नेताजीचे स्मरण करताना ब-याच आदिवासी गृपवर त्याचे विषयी सदभावना व्यक्त व्यक्त करण्यात आल्या. आज नेताजी असते तर ७४ वर्षाचे असते.त्याच्या जाण्याने बरेच नुकसान झाले.आमच्या कुटूंबातील तर वैचारिक- मानसिक आधारच गेला.
नेताजी नागपूर आकाशवाणीत न्यूज रिडर होता -बातम्या द्यायचा. त्यामुळे त्याला निश्चित पणे सर्वदूर ओळख दिली हे खरेच.नंतर तो आमदार ही झाला.पण एवढीच त्याची ओळख लोकांच्या स्मृतिपटलावर ठसली आहे.
नेताजी मानकी येथे असतांना माय सोबत मोळ्या विकायला वणीत यायचा.तो मॅट्रिक च्या परिक्षेत जनता विद्यालयातून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला.पुढे त्याला सायंस ला जायचे होते .तशी एडमिशन ही आनंदवनच्या काॅलेज मध्ये केल्याचे आठवते. पण बहुदा आर्थिक अडचणीमुळे त्याला ते पूर्ण करता आले नाही.मग वणीच्या लोकमान्य टिळक महाविद्यालयात आर्ट ला प्रवेश घेतला. तेव्हा आम्ही वणीच्या वार्ड नंबर चार मध्ये कोंडबाजी रामटेके यांचे घरी एका खोलीत भाड्याने राहत होतो. आई मजुरी करीत असे. कोंडबाजीचा मुलगा भरत ही नेताजी सोबत होता.कोंडबाजीने त्या दोघांना अभ्यासासाठी एक खोली उपलब्ध करुन दिली.नेताजी खुप अभ्यास करायचा. अक्षरशः रात्र रात्र जागून काढायचा. फक्त सकाळच्या विधीसाठी तेवढा बाहेर जायचा तेवढेच. हा अभ्यास चिमणी वर होता.चिमणी म्हणजे मातीचे तेलाचा छोटासा दिवा.प्री-युनिव्हर्सिटी ची परिक्षा झाली. आणि मे-जून मध्ये निकाल आला. नेताजी नागपूर विद्यापीठातून आठवा मेरिट आला.तेव्हा अमरावती विद्यापीठ अस्तित्वात यायचे होते.इंग्रजी विषयात डिस्टिंक्शन मिळाल होत.वणीच्या काॅलेज मधील बहुदा तो पहिला मेरिट असावा.अत्यंत अभावामध्येही त्याने-आम्ही शिक्षण पूर्ण केले.
आज प्रत्येक जात समुहात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले की विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो.वृत्तपत्रात बातम्या येतात. चार लोक कौतुक करतात.मदतीचे हात समोर येतात. पण आमचा आदिवासी समाज मुळातच आजपासून ५५ वर्षापूर्वी शिक्षणापासून कोसो दूर होता.त्यामुळे त्यांना ह्या मेरिट च माहित असण आणि कौतुक होण्याचा प्रश्नच नव्हता.त्यात त्यांचा दोष होता असे मी मानत नाही.कारण जगण्याचा संघर्षच इतका भयानक होता आणि त्यात शिक्षणापासून दूर असणे त्यामुळे ती जाणीव विकसीत होण्यास वेळ तर लागणारच.
या मेरिट मुळे महाविद्यालयातील तत्कालीन प्राचार्य राम शेवाळकर व अन्य प्राध्यापकांचा मात्र भरपूर स्नेह लाभला. महाविद्यालयाची समृद्ध लायब्ररी त्याला उपलब्ध करून देण्यात आली.त्याच काळात त्याचा काही कालावधी साठी अ.भा.वि.प.शी संपर्क आला.पण फारच अल्प. त्याचे वाचन अफाट, तीक्ष्ण निरिक्षण दृष्टी यामुळे तो राम मनोहर लोहिया कडे आकर्षित झाला. काॅलेज च्या “आराधना ” या वार्षिकांक मध्ये त्याने दोन- तीन दिर्घ लेख लिहिले.
पुढे तो रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशन शी जुळला.नंतर वणीतील कम्युनिस्ट पक्षाचे फाउंडर काॅम्रेड नामदेवराव काळेंनी त्याला लेनिनच्या जयंती ला भाषणाला बोलावले. ते भाषण वणीतील यात्रा मैदानरोडवरील पंजाब भवन येथे झाले होते.त्या भाषणाचे टेपरेकॉर्डरींग केल्या गेले होते. नामदेवरावांनी ते आम्हाला घरी येवून ऐकवले. कदाचित तेव्हापासून नेताजी डाव्या चळवळीत सक्रिय झाला.तो १९७० च्या दशकातील काळ होता.पुढे तो कम्युनिस्ट पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता झाला.वणी परिसरातील सर्व जाती धर्मातील विद्यार्थी त्याचे भोवती गोळा झाले.तो कम्युनिस्ट पक्षात असुनही सर्वाशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवून होता.सफाई कामगारांचे नेते,समाजवादी नेते,रिपाई चे नेत हे सर्वच त्याचे चाहते होते.
पुढे तो नागपूरला एम.ए .करायला गेला. तेव्हा नागपूर मधील नागेश चौधरी, भास्कर राऊत या सारखे जीवाभावाचे मित्र भेटले.याच काळात स्मृतिशेष प्रा. यादवराव वडस्कर यांनी “अभिजात” नावाचे साप्ताहिक सुरू केले.या साप्ताहिकात तो नियमित लिहीत.त्याच एक सदर होते ….निमाताईस( किंवा निताताई असेल )पत्र .यामधून सामाजिक भाष्य करत असल्याचे आठवते.याच नागपूर मध्ये रणजित मेश्राम, डाॅ.श्रीनिवास खांदेवाले इत्यादि सारखे स्नेही मिळाले.
नागपूर सुटले. पुन्हा वणीत कम्युनिस्ट पक्षाचे कामात व्यस्त झाला.या वेळी मारेगाव चे काॅम्रेड नथ्यूपाटील किन्हेकार याचा स्नेह लाभला.त्यांनी त्याला खूप सहकार्य केले.ए.आय .एस एफ चे संघटन त्यातून कम्युनिस्ट पक्षाची बांधणी. शेतकरी-शेतमजुरांचे लढे.अस सतत सुरू होत. असे असले तरी वाचन काही बंद नव्हते. अनेक अल्पशिक्षित, अर्धशिक्षित कार्यकर्ते नेताजींच्या आवाजाला ओ द्यायला तयार असत.कुंभा येथील काॅ. पुंडलिकराव चांदेकर, वडकीचे काॅ. केराम,कोलगावचे काॅ.भोंगळे. दारव्हाचे एक मुस्लीम समाजाचे काॅम्रेड होते आता नाव आठवत नाही.भद्रावतीचे काॅ.शेरूभाई. वसीम अहमद, बाबा अली असे कित्येक कार्यकर्ते होते.
१९७४ मध्ये मुंबईत नामदेव ढसाळ यांनी काळा स्वातंत्र दिन पाहावा असे आवाहन केले होते असे स्मरते. कम्युनिस्ट पार्टीचा तसा कोणताही काॅल नव्हता पण नामदेव ढसाळाच्या हाकेला ओ देत वणीत एआयएसएफ व कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने काळा स्वातंत्र दिन पाळण्यात आला.त्यासाठी शंभरेक कार्यकर्त्यांनी एसडीओ ऑफीस पर्यंत बॅनर घेऊन, विविध स्लोगन लिहीलेले खर्डे घेऊन आम्ही मूक मोर्चा काढला होता. आणीबाणीत कम्युनिस्ट पक्षाने आणीबाणीस पाठिंबा दिला होता.तेव्हा सरकारने वीस कलमी कार्यक्रम घोषित केला.त्या वीस कलम कार्यक्रमाचा प्रसार करण्यासाठी व अंमलबजावणीसाठी खेडोपाडी दौरे केले.वणीत अनधिकृत सावकाराकडून कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्याकाळी अंदाजे दोन अडीच लाखाचे गहाण सोडवून दिल्याची आठवण स्मरणात आहे.तेव्हा लोकमत ने त्याची दखल घेऊन बातमी दिली होती. आणीबाणीत उठवली गेली.कम्युनिस्ट पक्षाने आणीबाणीस पाठींबा ही चूक होती जाहीर केले.त्यानंतरच्या विधान सभा निवडणुकीत राळेगाव ची जागा कम्युनिस्ट पक्षाने लढवायचे ठरवले. तेव्हा मी उदयपूर ला होतो.पक्षाने नेताजीना उभे केले.तेव्हा साधारण पाच सहा हजार मत मिळाली असावी.
त्यानंतर नागपूर मध्ये लोकमत मध्ये काही दिवस उमेदवारी केली.याच काळात त्याला आकाशवाणीत न्यूज रिडरची नोकरी मिळाली. नोकरी काळातही सामाजिक काम,जयंती इत्यादि साठी विदर्भात फिरणे सुरुच होते.१९८१ ते १९९० पर्यंत आकाशवाणीत नोकरी केली. आणि १९९० ला नोकरीचा राजीनामा देऊन राळेगाव मधून जनता दलाचे उमेदवार वार म्हणून निवडणुक लढले .जिंकले.महाराष्ट्राच्या विधी मंडळात पोहचला. त्याच्या पहिल्याच भाषणाने तो लक्षवेधी ठरला. महाराष्ट्र टाइम्स मुंबई ने त्याचे ते भाषण “…..तर आदिवासींना मुंबईच्या समुद्रात ढकलून द्या!” या शिर्षकाने प्रसिध्द केले होते.पुढे तो काॅन्ग्रेस मध्ये आला.पुढच्या निवडणुकीत यवतमाळातील काॅन्ग्रेस पुढा-यांनी त्यात आदिवासी पुढारीही होते निश्चित झालेले त्याचे तिकीट कापले.तो अपक्ष होता.पण वेळ निघून गेल्याने उमेदवारी परत घेता आली नाही. आमदार असतांना वणीला व्ही. पी सिंग व रामविलास पासवान यांची न भुतो न भविष्यती अशी सभा झाली होती.लोकसभेच्या निवडणूका आल्या तेव्हा त्याला चिमूर मधून जनता दलाने उभे केले.जनता दलाच्या विनिंग सीट मधली ती एक सीट होती. पण राजीव गांधी यांचा निर्घृण मृत्यू झाला आणि सारेच चित्र बदलले. पण तो कधीच खचला नव्हता. त्याचे काम थांबले नव्हते. त्याला कविता,चित्रपट, वाचन याची आवड होतीच.त्याचेकडे मोठा ग्रंथसंग्रह होता. १९८४ ला इंदिरा गांधी यांची निर्घृण हत्या झाली होती तेव्हा त्याने इंदिरा गांधीवर लोकमतला दिर्घ कविता लिहीली होती.
असा बहुआयामी नेताजी – माझा भाऊ आज आपल्यात नाही.त्याला जावून आठ वर्षे झाली.
आपण सर्वांनी त्याचे आठवणीने स्मरण केले.त्याबद्दल मी राजगडकर परिवारा तर्फे आपला ऋणी आहे.

प्रभू राजगडकर, नागपूर
दि १५ जाने२०२३



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

About

The Vidarbha Gazette: An Introduction

Digital media has democratized the production and consumption of media to an extent that would have been unimaginable in the past. Media production is no longer at the mercy of a few family-owned businesses and corporate houses. Roughly speaking, every person who has an android phone in hand and a few bucks to recharge their data pack have the potential to produce news and not just consume it.